Thursday 15 October 2015

नवदुर्गा ३: सुपर्णा



"ती" अजूनही थरथर कापत होती. 'ते' ऐकलं तेव्हा आधी ती स्तब्ध उभीच राहिली. शून्यात डोळे लावून एकटक बघत राहिली. हळूच डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. मध्येच जोरात हंबरडा फोडला. दबकन खाली बसली. वेड्यासारखंच करायला लागली. तिच्या ज्या मैत्रिणीने तिला 'ते' सांगितलं तीच तिची समजूत काढायला लागली. तिला सावरायला लागली. थोड्यावेळाने तिला शुद्ध आली. जे ऐकलं ते खरं आहे, ह्यावर तिचा विश्वास बसला. आणि त्यापुढे संघर्ष सुरु झाला 'ते' सत्य पचवण्याचा!!

नवऱ्याचं कुणा दुसऱ्या स्त्रीवर प्रेम आहे, हे सत्य पचवणं कुणाही स्त्रीसाठी अवघडच असतं. आणि त्यात ते वयाच्या ४८व्या वर्षी कळावं आणि तेही घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असताना! हा क्रूर योगायोग म्हणायचा की काय? "…आपल्याशी संसार करता-करताच आपल्या नवऱ्याने दुसऱ्या कुणावरही प्रेम केलं, आपल्याला फसवून केलं, सगळ्या जगाला अंधारात ठेवून केलं. काय ह्याचा अर्थ? आपण अगदीच मूर्ख ठरलो का? आपल्या लक्षातच आलं नाही. मुळात त्याने आपल्यावर कधीच प्रेम केलं नसेल का? आपल्याशी लग्नच का केलं असेल मग?" एक ना दोन अनेक विचारांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं. 


सुपर्णा खूपच साधी सरळ होती. तिच्या आणि प्रसादच्या लग्नाला २ महिन्यांपूर्वीच २६ वर्षं पूर्ण झाली होती. ह्या २६ वर्षांत सुपर्णाने संसारासाठी सर्वस्व अर्पण केलं होतं. खरंतर घर, नवरा आणि तिची एकुलतीएक मुलगी श्वेता हेच तिचं आयुष्य होतं. त्यापलीकडे ती कधी गेलीच नाही. 

सुपर्णा आणि प्रसाद ह्यांचा प्रेमविवाह. त्या दोघांची भेट त्यांच्या एका common मैत्रिणीकडे झाली होती. प्रसाद त्यावेळी J.J. School of Art ला
Fine Arts करत होता. आणि सुपर्णा SNDT महाविद्यालयातून Home Science करत होती. तसं पाहता त्या दोघांमध्ये काहीच साम्य नव्हतं. प्रसाद कलाकार वृत्तीचा, स्वैर, रसिक. आणि सुपर्णा अगदीच सरळमार्गी. तिला शिस्त, टापटीपपणा आवडे; तर त्याला पसारा. तिला स्वैपाकाची, घर सजवण्याची आवड; तर त्याला फिरण्याची. तरीही प्रसाद तिच्या प्रेमात पडला. कदाचित त्यामुळेच पडला.

मुळात प्रसाद एका बड्या घरातला होता. पण लहानपणीपासूनच त्याचं कौटुंबिक जीवन ताणतणावाने भरलेलं होतं. त्याचे वडील जगप्रसिद्ध चित्रकार होते. पण प्रसादची आई अगदी लहानपणीच गेल्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. सावत्र आईजवळ वाढल्यामुळे प्रसादला प्रेम कधी मिळालंच नाही. आई-वडिलांचे वाद, वडिलांची प्रकरणं, त्यांच्या सर्वत्र चर्चा, वडिलांची दारू  ह्या सगळ्याचाच त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम झालेला होता. तो कळत्या वयात आला, आणि वडिलांचेही निधन झाले. ह्या सगळ्यामुळे प्रसाद खूप एकलकोंडा झाला. त्याला ह्यातून बाहेर पडून एक सरळ साधं आयुष्य जगावंसं वाटे. म्हणूनच त्याची नजर एका संसारी, शालीन मुलीला शोधत होती. सुपर्णाच्या रूपाने त्याला 'ती' मिळाली.

त्याच्या अगदी उलट सुपर्णाची कौटुंबिक पार्श्वभूमी होती. ती चाळीच्या २ खोल्यांत वाढली. तिचे वडील सरकारी तार विभागात कर्मचारी आणि आई गृहिणी. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पण घरात प्रेम, माया, ऊब भरपूर होती. सुपर्णा एकुलतीएक असल्याने तिच्यावर आईवडिलांचा खूप जीव. त्यांनी तिच्यावर संसार केले, तिला ऐपतीप्रमाणे शिकवलं आणि मोठं केलं. प्रसादशी लग्नाला खरंतर तिच्या आई-वडिलांचा होकार नव्हता. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि चित्रकार असल्यामुळे आर्थिक अस्थिरता अशी दोन्ही कारणं होती त्यामागे. पण तरीही मुलगा स्वभावाला चांगला आहे आणि मुलीला आवडला आहे, म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं.

सुपर्णा-प्रसादच्या संसाराची सुरुवात आर्थिक हालाखीतच झाली. प्रसाद खूप उत्तम दर्जाचा चित्रकार होता. त्याचं सगळीकडे नाव होतं, मोठमोठ्या लोकांत उठबस होती. पण ह्या सगळ्याची परिणती आर्थिक भरभराटीत व्हायला वेळ लागला. त्याला सुरुवातीला खूप struggle करावं लागलं. पण सुपर्णाने कधी तक्रार केली नाही. असेल त्या परिस्थितीत दिवस काढले. छोट्या श्वेतालाही मोठ्या हुशारीनं वाढवलं, शिकवलं. आपल्या अडचणींची झळ तिच्यापर्यंत कधीच पोहोचू दिली नाही. सुपर्णाच्या अस्तित्वानेच त्या घराला 'घरपण' आलं. प्रसादला हवं होतं तसं साधं-सरळ तरीही सुखा-समाधानाचं आयुष्य तिने त्याला दिलं!!!

"इतका सुखी-समाधानी संसार केला आम्ही दोघांनी.. चांगले वाईट दिवस एकत्र जगलो, एकमेकाला आधार दिला.. तरीही असं कसं वागला प्रसाद? मी कुठे कमी पडले का? मी त्याला सुख दिलंच नाही का?…" सुपर्णाची विचारचक्र फिरतच होती. प्रसाद तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तिच्या कानांवर त्याचं बोलणं आदळत होतं, मात्र मेंदूपर्यंत एकही वाक्य पोहोचत नव्हतं. खरंतर तिला पोहोचू द्यायचं नव्हतं.

प्रसादचं तिच्या जवळ असणं आणि 'त्या' गोष्टीचं समर्थन करून वर तिचीच समजूत काढणं, नकोच वाटू लागलं तिला. ती जोरात गरजली त्याच्या अंगावर, "गप्प बस. बास कर तुझं..." असं म्हणून सुस्कारा सोडला. मग शांतपणे म्हणाली, ".. श्वेताचं लग्न एका महिन्यावर आलंय. घरात खूप कामं पडलीयेत. अजून खूप तयारी व्हायचीये. त्यामुळे हा विषय बस करूया आता. श्वेताची पाठवणी होईपर्यंत काही बोलायचं नाही ह्यावर. त्यानंतर बघू."

ठरल्याप्रमाणे श्वेताचं लग्न थाटामाटात पार पडलं. सगळं दुःख पोटात घालून सुपर्णाने लग्नाची तयारी केली. चेहेऱ्यावर कायम हसू ठेवलं; इतकं की श्वेताला देखील शंका येऊ दिली नाही. लग्न करून श्वेता नवऱ्याकडे गेली. आता घरात सुपर्णा आणि प्रसाद दोघेच राहिले. खरंतर हे दिवस दोघांनी मिळून एकमेकाला सावरण्याचे आणि आयुष्य नव्याने सुरु करण्याचे असतात. ह्यालाच आपण 'सेकंड इनिंग' म्हणतो. पण सुपर्णासाठी 'सेकंड इनिंग' चा अर्थ वेगळाच ठरला!

स्वतःच स्वतःवर घातलेल्या बेड्या तिने एकदम मोकळ्या केल्या. प्रसादला घरातून निघून जायला सांगितलं. ते घर प्रसादच्या नावावर असलं तरी ते तिने कष्टाने उभं केलेलं होतं. त्यावर नैतिकदृष्ट्या तिचाच अधिकार होता. प्रसादने सुरुवातीला प्रतिवाद केला; कधी रडून, कधी ओरडून, कधी समजावून. त्याला सुपर्णाला सोडून जायचं नव्हतं. त्याचा अजूनही खूप जीव होता तिच्यावर. तिच्या मनातून मात्र तो कायमचा उतरला होता. ती त्याच्या कुठल्याच बोलण्याला बळी पडली नाही. तिने मनाशी ठाम ठरवलं होतं. एकदा घटस्फोटाचा विचारही तिच्या मनात आला. पण ह्या वयात वकील, कोर्टकचेऱ्या, counseling च्या भानगडीत कुठे पडणार. तिने टाळला तो मार्ग. तिने मनानेच त्याला घटस्फोट देऊन टाकला. शेवटी नाईलाजाने प्रसाद घर सोडून गेला.

आता सुपर्णा एकटीच होती, 'ती'च्या घरात! 'ती'ची तिलाच नव्याने ओळख करून घ्यायची होती. तिला 'ती'च्या बरोबर नव्याने आयुष्य सुरु करायचं होतं. भूतकाळ विसरून वेगळाच भविष्यकाळ घडवायचा होता!

तिने तिची जुनी पुस्तकं माळ्यावरून खाली काढली. सगळी धूळ पुसून टाकली. पुस्तकांसाठी छान नवीन जागा केली. पुन्हा नव्याने तीच पुस्तकं वाचायला सुरुवात केली. तिला परत interest येत गेला. तिने SNDT महाविद्यालयात MSc साठी प्रवेश घेतला. आणि २७ वर्षांपूर्वी सोडून दिलेलं शिक्षण पुन्हा सुरु केलं. M.Sc साठी तिने Nutrition हा विषय निवडला. M.Sc यशस्वीपणे पूर्ण केल्यावर तिने PhD साठी प्रवेश घेतला. आणि "Menopause and Nutrition" ह्या विषयावर संशोधन सुरु केलं. एका maternity home मध्ये तिने चौकशी केली. तिला special cabin आणि time slot दिला गेला. तिथे तिने स्वतःची practice सुरु केली. दरम्यान तिला पनवेलजवळील एका महिलाश्रमाविषयी माहिती मिळाली. तिने दर मंगळवारी तेथे भेट द्यायला सुरुवात केली. तेथील महिलांना आरोग्य आणि आहार ह्या विषयावर ती व्याख्याने  देऊ लागली.

प्रसाद काहीवेळा तिला फोन करे, तिला भेटायला येई. पण सुपर्णा कामात इतकी व्यस्त असे, की त्याला भेटूच शकत नसे. खरंतर त्याला भेटण्याची तिला आता गरजच नव्हती. ती त्या रस्त्यावरून खूप पुढे निघून गेली होती. परत कधीच U-turn नं घेण्यासाठी!! तिच्या 'सेकंड इंनिंग' मध्ये त्याला जागाच नव्हती!!!

No comments:

Post a Comment