Wednesday 14 October 2015

नवदुर्गा २: संगीता


संगीता तशी फारच शांत होती. हॉस्पिटलमधील कुणाशीच ती फारसं बोलत नसे. गप्पा नाहीत, हसणं- खिदळणं नाही की 'gossiping' नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं, बाकी कुणाशी देणं-घेणं नाही. कामात मात्र ती अगदी तरबेज होती. Gynecology हे तिचं 'passion' होतं. त्यात तिचं मन रमे. आपलं काम अत्यंत आवडीने आणि मन लावून करायची ती.

तिच्या कामातील कौशल्यामुळे तिच्या विभागाचा प्रमुख डॉ. प्रशांत आठवले तिच्यावर खुश होता. संगीतावर एकदा काम सोपवलं की त्याला लक्ष द्यावं लागत नसे. प्रशांत तसा होता पस्तिशीतला. पण शिक्षणाने आणि कर्तृत्वाने मोठा असल्यामुळे त्याला एवढ्या लवकरच विभागप्रमुखाचं स्थान मिळालं होतं. त्यानेच संगीताचा इंटरव्यू घेऊन तिची नेमणूक केली होती.

हळूहळू दोघांची मैत्री होऊ लागली. म्हणजे संगीता सुरुवातीला शांतच असे, फारशी बोलत नसे. प्रशांतच आपणहून पुढाकार घेऊन बोलायला जाई. कधी कामाच्या निमित्ताने, कधी घरी सोडण्याच्या निमित्ताने, कधी कॉफी प्यायला जाण्याच्या निमित्ताने. पाहता पाहता संगीताही मोकळी होऊ लागली. मनातलं बोलू लागली. एके दिवशी CCD मध्ये कॉफी पीत असताना संगीताने तिचा भयंकर भूतकाळ प्रशांतपुढे उलगडला, ज्याने तो पुरता हेलावून गेला.

संगीता मुळची उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधली. तेथील एका खेडेगावात तिचं घर होतं. तिथेच ती जन्मली, वाढली. घर खूप मोठं होतं. आणि एकत्र कुटुंब. घरात ५ भावांचे संसार, त्यांची कुटुंब, मुलंबाळं. ५ भावांमध्ये संगीताचे वडील सगळ्यात धाकटे आणि त्यांना संगीता ही एकच मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती सुखवस्तू होती. पण वैचारिकदृष्ट्या बुरसटलेली. सगळ्या घराचा मिळून एक व्यवसाय होता. संगीताचे वडीलही त्याच व्यवसायात होते. लहान असल्यामुळे त्यांना घरात आणि धंद्यात मोठ्या भावांचं ऐकावंच लागे. एकाच अपत्याला आणि त्यातही
मुलीला जन्म दिल्यामुळे त्यांची सगळेच हेटाळणी करत.

कुटुंबात शिक्षणाचं वातावरणच नव्हतं. संगीताची आई, काकू कुणालाच लिहिता वाचता येत नसे. घरातील व्यवहारातही त्यांचं मत कुणी विचारत नसे. संगीताच्या मोठ्या चुलत बहिणीही जेमतेम ५-७ इयत्ता शिकल्या आणि भरमसाट 'दहेज' देऊन त्यांची लग्न करून दिली. एकूणच त्यांच्या घरात मुलींच्या शिक्षणावर बंधनं होती. लहान वयापासूनच संगीताला घरकाम शिकवलं गेलं. आणि ती १४-१५ वर्षाची असल्या पासूनच घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. 

अशा परिस्थितीत वाढणाऱ्या संगीताला मात्र शिकायचं होतं. डॉक्टर व्हायचं होतं. ती अतिशय उत्साहाने शाळेत जाई, मन लावून अभ्यास करे. फावल्या वेळातही ती काहीतरी वाचत बसे. संगीताने शिकून मोठं व्हावं
असं तिच्या वडिलांनाही वाटे. पण भावांच्या पुढे त्यांचं काहीच चालत नसे.

संगीता १२वी पास झाल्यावर तिच्यासाठी 'रिश्ते' यायला लागले. पण त्याचवेळी तिला बनारस हिंदू विद्यापीठात MBBS ला प्रवेश मिळाला. त्यामुळे तिचं शिक्षण पुढे सुरु राहावं, असा हट्ट तिच्या वडिलांनी धरला. त्यातून मध्यम तोडगा म्हणून लग्न करून देऊन मग शिक्षण सुरु ठेवावं,
असा निर्णय झाला. संगीताचं लग्न झालं तेव्हा ती १८ वर्षांची होती आणि तिचा नवरा होता २० वर्षांचा. २-३ प्रयत्नात कसाबसा १२वी पास झालेला. तो मुलगा घरचाच व्यवसाय पाहत होता. गोरखपूर मधील एका धनाढ्य कुटुंबात लग्न झालेलं तिचं. 

लग्नानंतर संगीता सासरी गेलीच नाही. ठरल्याप्रमाणे बनारसला गेली आणि डॉक्टरकीच्या शिक्षणाला सुरुवात केली. ५ वर्षात MBBS
यशस्वीपणे पार केलं. विद्यापीठात पहिली आल्यामुळे तिला MDलाही सहज प्रवेश मिळाला. MD साठी तिने Gynecology हा विषय निवडला. तिला सुरुवातीपासूनच त्या विषयात रस होता. स्त्रीला मिळालेला सृजनाचा अधिकार, तिच्या पोटी होणारी नवीन जीवाची उत्पत्ती ह्याबद्दल तिला अप्रूप वाटे. संगीताच्या MD करण्याच्या निर्णयाने तिच्या घरची आणि सासरची मंडळी अस्वस्थ होत होती. पण ह्यावेळीही संगीताच्या वडिलांनी ठाम राहून सगळ्यांना समजावलं. ह्याप्रसंगी तिच्या कॉलेजमधील प्रध्यापाकांचंही मोलाचं सहकार्य लाभलं. 

संगीताने MD चा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मात्र तिचं काहीच चाललं नाही. एक छोटासा समारंभ करून तिची सासरी पाठवणी करण्यात आली. सासरी जगलेला एकेक दिवस संगीताचं काळीज चिरत होता. सासरी कुणालाच तिच्या शिक्षणाचा काही गंध नव्हता आणि त्याबद्दल काडीचंही कौतुक नव्हतं. घरातील २५-३० माणसांचा स्वैपाक, झाडलोट, धुणी-भांडी असल्या कामात संगीताचा अख्खा दिवस जाऊ लागला.

काही दिवस गेल्यावर तिने 'दवाखाना' सुरु करण्याचा मानस नवऱ्याजवळ बोलून दाखवला. पण त्यानेही काही फारसा उत्साह दाखवला नाही. उलट
स्वतः कमी शिकलेला असल्यामुळे त्याचं frustration वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडत असे. संगीताशी तो तुसडेपणानेच वागे. घरातील 'बुजुर्ग' लोक देखील तिने दवाखाना सुरु करण्याच्या विरोधातच होते. घरातील बाईने बाहेर काम करणं हे त्यांच्या 'घराण्याची इभ्रत' मातीत मिळवणारं होतं.

संगीता कशीबशी त्या घरात दिवस ढकलत होती. शिक्षण फुकट जात होतं, स्वप्नं धुळीला मिळत होती आणि त्याबद्दल आजूबाजूच्या मंडळींना काहीच वाटत नव्हतं. काही बोलावं तर उलट तिलाच सुनावलं जाई. येता-जाता टोमणे सुरूच असत. शिवाय आता तिच्यावर मुल होण्यासाठी दबाव सुरु झाला. संगीताला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. ती एकटीच आपल्या खोलीत जाऊन रडत बसे. कुणाशी बोलताही येत नव्हतं.

एके दिवशी आवरा-आवरी करताना संगीताच्या सासूला गर्भ-निरोधक गोळ्यांचं पाकीट सापडलं. आणि त्या पाकिटाने एक प्रचंड चक्रीवादळ निर्माण झालं. जोपर्यंत नवीन वातावरणाशी जुळून येत नाही, तोपर्यंत मुल होऊ द्यायचं नाही, असा संगीताचा विचार होता. मात्र त्यामुळे तिला खूप सहन करावं लागलं. सासूने तिला बेदम मारलं, तिच्यावर खूप आरडा-ओरडा केला. ती गोळ्यांची हकीकत घरभर सांगितली. तिने खूप मोठा अपराध केला होता, असे मानून सगळे तिला खूप बोलले. तिच्या माहेरी फोन लावून पण बडबड केली. आणि भर दुपारी तिला घरातून हाकलून दिलं.

अशा परिस्थितीत माहेरी परत जावं, तर दुप्पट अपमान, अवहेलना पदरी पडली असती. कुटुंबियांचे टोमणे, टोचणाऱ्या नजरा हे सगळंच सहन करावं लागलं असतं. त्यामुळे माहेरी परत नं जाण्याचा निर्णय तिने घेतला. वडिलांशी फोनवर बोलली. त्यांनी ह्यावेळीही तिला धीर दिला. ती जो निर्णय घेईल त्यात सोबत असल्याचं सांगितलं. संगीता खचली नाही. धक्क्यातून उठून उभी राहिली. दुसऱ्याच दिवशी तिने मुंबई गाठली.

संगीताची कॉलेजमधली एक जुनी मैत्रीण लग्न करून मुंबईत स्थायिक झाली होती. संगीता तिच्याकडे गेली. काही दिवस तिच्याकडे राहिली. मैत्रिणीने आणि तिच्या नवऱ्याने संगीताला समजून घेतलं, तिला आधार दिला. संगीताने खूप मेहनतीने नवीन नोकरी शोधली. रहायला भाड्याचं घर शोधलं. आणि पूर्णतः नवीन आयुष्याला सुरुवात केली. तिथून मागे वळून कधी पाहिलंच नाही.

प्रशांतशी बोलताना तिला तो भूतकाळ पुन्हा एकदा आठवला. ती कष्टी झाली. प्रशांतही हादरून गेला होता. त्याच्या कल्पांतापलीकडचं होतं हे सगळं. तो शांत बसून राहिला. संगीताही कित्येकवेळ टिपं गाळत राहिली.

संगीताचा भूतकाळ जाणल्यावर प्रशांत तिच्या अधिकच जवळच गेला. तिची जास्त काळजी घेऊ लागला. संगीतालाही त्याचा आधार वाटू लागला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला लागला. दोघं खूपवेळ एकमेकांच्या सोबतच घालवू लागले. आणि काही दिवसांनी त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

लग्न नं करताच त्या दोघांनी संसाराला सुरुवात केली. मनं जुळली असल्यामुळे कदाचित त्यांना लग्नाची गरजच भासली नसेल. शिवाय दोघांनाही जवळचं असं कुणीच नव्हतं. मग लग्न करायचं तरी कुणासाठी? आणि कशासाठी?

एकमेकांच्या साथीने दोघांनी प्रसूती-शास्त्रात खूप काम केलं. मुल नं होणाऱ्या स्त्रियांवर उपचार करून त्यांना मुल व्हावं, ह्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, नवनवीन टेक्निक्स शिकले, खूप अभ्यास केला, परदेशी जाऊन कोर्सेस केले. आज ते दोघेही मुंबईतील प्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या कार्याने त्यांनी अनेक आई-वडिलांच्या चेहेऱ्यावर हास्य पसरवलं आहे.

आज त्यांनाही एक गोंडस गोजिरी मुलगी आहे. तिघं सुखा-समाधानाचं आयुष्य जगत आहेत.

No comments:

Post a Comment